Marathi

Proverbs

20

1द्राक्षारस आणि मद्य यामुळे लोकांचा स्वत:वरचा ताबा जातो. ते खूप जोरात बोलतात आणि फुशारकी मारायला लागतात. ते झिंगलेले असतात आणि मूर्खासारख्या गोष्टी करायला लागतात.2राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो. तुम्ही जर राजाला राग येऊ दिला तर तुम्ही तुमचे प्राणदेखील गमावू शकता.3कुठलाही मूर्ख वादविवादाला सुरुवात करु शकतो. म्हणून जो वादविवादाला नकार देतो त्याचा तुम्ही आदर करु शकता.4आळशी मनुष्य बी पेरायचादेखील आळस करतो. म्हणून हंगामाच्या वेळी तो अन्न शोधतो, पण त्याला काहीही मिळत नाही.5चांगला उपदेश हा खोल विहिरीतून घेतलेल्या पाण्यासारखा असतो. परंतु शहाणा माणूस दुसऱ्याकडून शिकण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.6बरेच लोक आपण प्रामाणिक आणि प्रेमळ आहोत असे सांगतात. पण खरोखरच असा माणूस सापडणे कठीण असते.7चांगला माणूस चांगले आयुष्य जगतो आणि त्याच्या मुलांना आशीर्वाद मिळतात.8जेव्हा राजा बसून लोकांचा न्यायनिवाडा करतो तेव्हा त्याला स्वत:च्या डोळ्यांनी वाईट गोष्टी बघता येतात.9कुठलाही माणूस आपण प्रयत्नांची पराकाष्टा केली असे खरोखरच म्हणू शकेल का? मी पाप केले नाही असे कुणी खरोखर सांगू शकेल का? नाही.10जे लोक चुकीची वजने आणि तराजू वापरुन लोकांना फसवतात त्यांचा परमेश्वर तिरस्कार करतो.11लहान मूल सुध्दा आपल्या कृतीने आपण चांगले आहोत की वाईट ते दाखवू शकते. त्या मुलाकडे लक्षपूर्वक पाहून तो प्रामाणिक आणि चांगला आहे की नाही ते तुम्ही समजू शकता.12आपल्याला बघायला डोळे आणि ऐकायला कान आहेत आणि ते परमेश्वरानेच आपल्यासाठी केले आहेत.13जर तुम्हाला झोपायला आवडत असेल तर तुम्ही गरीब व्हाल. पण तुमच्या वेळेचा काम करुन उपयोग करा आणि तुम्हाला भरपूर खायला मिळेल.14एखादा माणूस तुमच्याकडून काही विकत घेतो तेव्हा तो म्हणतो, “हे योग्य नाही, याची किंमत फार आहे.” नंतर तोच माणूस इतरांना जाऊन सांगतो की त्याने फार चांगला व्यवहार केला.15सोने आणि हिरे माणसाला श्रीमंत बनवतात. परंतु जर एखाद्याला तो काय बोलतो आहे हे कळत असेल तर त्याची किंमत खूपच जास्त असते.16तुम्ही जर दुसऱ्या माणसाच्या कर्जासाठी स्वत:ला जामीन ठेवलेत तर तुम्ही तुमचे कपडे सुध्दा घालवून बसाल.17तुम्ही जर फसवून कुठली गोष्ट घेतलीत तर ती चांगली आहे असे तुम्हाला कदाचित् वाटेल. पण शेवटी ती कवडीमोलाचीच ठरेल.18योजना आखण्या आधी चांगला सल्ला घ्या. तुम्हाला जर युध्द सुरु करायचे असेल तर मार्गदर्शनासाठी चांगल्या लोकांना शोधा.19जो माणूस इतरांबद्दल काही गोष्टी सांगतो, त्यांच्यावर विश्वास ठेवणे शक्य नसते. म्हणून जो खूप बोलतो त्याच्याशी मैत्री करु नका.20जर एखादा माणूस त्याच्या आईविरुध्द किंवा वडिलांविरुध्द बोलला तर तो अंधार होणारा प्रकाश आहे.21जर तुम्हाला सहज संपत्ती मिळाली असेल तर तिची तुम्हाला किंमत नसते.22जर कुणी तुमच्याविरुद्व काही केले तर त्याला शिक्षा करायचा तुम्हीच प्रयत्न करु नका. परमेश्वरासाठी थांबा. शेवटी तोच तुम्हाला विजयी बनवेल.23काही लोक फसवी वजने आणि मापे वापरतात. ते त्याचा उपयोग लोकांना फसवण्यासाठी करतात. ते परमेश्वराला आवडत नाही. त्यामुळे त्याला आनंद होत नाही.24प्रत्येकाच्या बाबतीत जे काय घडते ते परमेश्वर ठरवतो. म्हणून आपल्या आयुष्यात काय घडणार आहे ते माणासाला कसे काय कळेल?25देवाला काही वस्तू देण्याचे वचन देण्याआधी विचार करा. नंतर तुम्ही तसे वचन द्याला नको होते असे तुम्हाला वाटू शकेल.26दुष्ट लोक कोणते ते शहाणा राजाच ठरवील. आणि तो राजाच त्या लोकांना शिक्षा करील.27मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय. माणसाच्या मनात काय आहे ते परमेश्वराला कळू शकते.28राजा जरा प्रामाणिक आणि सत्यवचनी असला, तर तो त्याची सत्ता राखू शकतो. त्याचे खरे प्रेम त्याचे राज्य बलकट ठेवते.29आपण तरुण माणसाचे त्याच्या शक्तीबद्दल कौतुक करतो. पण आपण वृध्दाला त्याच्या पांढऱ्या केसांमुळे मान देतो. त्यावरुन तो पूर्ण आयुष्य जगाला हे दिसते.30आपल्याला शिक्षा झाली तर आपण चुका करणे थांबवू. दु:ख माणसाला बदलू शकते.